लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा नगर जिल्ह्यात माहेगाव देशमुख (ता. कोपरगाव) येथील तरुण शेतकरी प्रसाद भागीनाथ काळे यांची निर्यातक्षम द्राक्षबाग विक्रीच्या तयारीत होती. अशावेळी व्यापाऱ्यांशी संपर्क करून काळे थकले, कोणीही खरेदीला येईनात. अखेर बहिणीच्या सल्ल्यानुसार सोशल मिडीयावरून जाहिरात करून त्यांनी घरोघरी जाऊन व जागेवर सुमारे १२ ते १३ टन द्राक्षांची निर्यात करण्यात यश मिळवले. स्वतःची विक्री स्वतःच उभारून बागेचे आर्थिक नुकसान टाळले.
नगर फोटोजिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील तरुण शेतकरी प्रसाद भागीनाथ काळे यांची दोन एकर द्राक्षशेती आहे. पैकी एक एकर नवी व एक एकर काढणीस आलेली होती. निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन ते घेतात. निर्यातीचे त्यांचे हे तिसरे वर्ष आहे. यंदाही त्यांना निर्यात करायचा होता. बागेतील सुमारे ३२ गल्ल्यांपैकी सुमारे सहा गल्ल्यांमधील द्राक्षे निर्यातीसाठी त्यांनी व्यापाऱ्यांना दिलीही. त्यांना किलोला ६५ ते ७५ रुपये दरही मिळाला होता.
दरम्यान लाॅकडाऊनचा काळ सुरू झाला. काळे यांनी व्यापाऱ्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली. मात्र कोणीही खरेदीला येईनात. काळे हताश झाले. सर्व निर्यातक्षम उत्पादन वाया जाते काय अशी भिती वाटू लागली. काही व्यापाऱ्यांनी बांधावर येऊन सात रुपये प्रति किलो दराने मागणी केली. बेदाण्याचा पर्यायही विचारात घेतला. मात्र त्यासाठी पुरेशी जागा व सुविधाही नव्हती. आठ दिवस झोप येत नव्हती. बहिणीने दिला पर्याय मढी (ता. कोपरगाव) येथील सरपंच असलेल्या बहीण वैशालीताई आभाळे अशावेळी मदतीला धावून आल्या. त्यांनी व्यापाऱ्यांना अल्प दरात विकण्यापेक्षा थेट ग्राहकांना घरपोच द्राक्षे विकण्याची कल्पना सुचवली. धीर व बळही दिले. त्यानुसार सोशल मिडीयाच्या माध्यमातून काळे यांनी त्यासंबंधी जाहिरात पाठवण्यास सुरुवात केली. त्याद्वारे कोपरगाव येथील शेतकरी कंपनीचे व्यवस्थापक यांनी बंगले व निवासी कॉलनी यांचा संपर्क मिळवून देण्यास मदत केली. सुमारे ७५ किलोची ऑर्डर त्यांनी दिली. ग्राहकांचा असा प्रतिसाद मिळू लागला.
दरम्यान निलेश बिबवे, नगर येथील ‘आत्मा’ चे समन्वयक श्रीकांत जावळे यांनीही मोठी मदत केली. दोन, चार, दहा किलोचे पॅकिंग करून कोपरगाव शहरासह परिसरातील घारी, चांदेकसारे, मढी, धारणगाव, कुंभारी, कोळपेवाडी आदी गावांत काळे यांची द्राक्षे जाऊ लागली. सुमारे १२ टनांची विक्री स्वतःच्या वाहनातून घरपोच सुमारे चार टन मालाची विक्री प्रति किलो ३० रुपये दराने काळे यांनी यशस्वी केली.
उर्वरित विक्री जागेवरच ग्राहकांना तसेच स्थानिक विक्रेत्यांना २५ ते २० रुपये दराने केली. एकूण सुमारे १२ टन द्राक्षांची विक्री अशा रितीने पूर्ण करण्यात काळे यशस्वी झाले. काळे म्हणाले की निर्यातीसाठी किलोला किमान ६५ रुपये वा त्यापुढे दर राहिला असता. तरीही थेट विक्रीतून बागेचे होणारे आर्थिक नुकसान पूर्णपणे वाचले ही फार समाधानाची बाब आहे. विक्रीतून आत्मविश्वासही मिळाला. संपर्क- प्रसाद काळे- ८७८८२१०३०६
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
0 Comments