सध्या पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या व मुळच्या बोरगाव ढोले (ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा) येथील अभियंते अनिल ढोले यांनी शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता असलेल्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. हे यंत्र पीक आणि तणातील फरक ओळखून नेमकी फवारणी करत असल्याने रसायनांमध्ये बचत होते.
शेतीमध्ये यंत्राची गरज वेगाने वाढत चालली आहे. या यंत्रांना कृत्रिम बुद्धीमत्तेची जोड देण्याची आवश्यकताही वाढत आहे. परदेशामध्ये अशी अनेक अवजड यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहेत. मात्र, भारतीय स्थिती आणि शेती पद्धतीचा विचार करता वेगळ्या खास विकसित केलेल्या यंत्रांची गरज आहे. टाटा टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रकल्प व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या अनिल ढोले या अभियंत्यांने शेतकऱ्यांच्या समस्या आणि गरजा यांचा विचार करून कृत्रिम बुद्धीमत्ता असलेल्या रोबोट (यंत्रमानव) विकसित केला आहे. नेमकेपणाने पिकावर फवारणी (सिलेक्टिव्ह स्प्रेईंग) करत असल्याने रसायने वाया जात नाहीत. २०१९-२० मध्ये केंद्र सरकारच्या स्टार्ट अप इंडिया या स्पर्धात्मक योजनेमध्ये पहिल्या दहा क्रमांकांमध्ये या रोबोटची निवड झाली होती.
रोबोटची वैशिष्ट्ये
- या रोबोटवर दोन कृत्रिम बुद्धीमत्ता युक्त कॅमेरे बसवलेले असून, त्यांची क्षमता प्रत्येकी १० वर्गफूट इतकी आहे. या कॅमेराद्वारे टिपलेल्या प्रतिमांचे विश्लेषण करून सूचना दिलेल्या विशिष्ठ पिकांची नोंद घेतली जाते. नेमकेपणाने तेवढ्याच रोपांवर फवारणी करणे शक्य होते. दोन रोपांच्या मध्ये असलेली मोकळी जागा किंवा अन्य आंतरपिकांवर फवारणी केली जात नाही. या अचूकतेमुळे रसायनांचा अत्यंत कार्यक्षम वापर करणे शक्य आहे. पर्यायाने रसायनांमध्ये बचतीसोबतच पर्यावरणाला पुरक ठरणार आहे.
- सध्या दोन ते तीन फूट उंचीच्या पिकांसाठी या रोबोटचा वापर करता येतो.
- या रोबोटच्या माध्यमातून २० फुटापर्यंतच्या क्षेत्रावर फवारणी करता येते.
- बॅटरी ऑपरेटेड असलेला हा रोबोट एकदा चार्ज केल्यानंतर ५० एकरापर्यंत फवारणी करतो.
- प्रत्यक्ष शेतामध्ये या रोबोच्या चाचण्या घेण्यात येत असून, प्रात्यक्षिकामध्ये भाग घेऊ इच्छिणारे शेतकरी संपर्क करू शकतात, असे अनिल ढोले यांनी सांगितले.
सातारा जिल्हा प्रशासनाला दिला कोवी रोबो
टाटा टेक्नॉलॉजीमध्ये अनिल ढोले यांनी रिमोट कंट्रोलद्वारे वापरता येईल, अशा प्रकारचे यंत्र बनवले आहे. या यंत्रामध्ये व्हिडिओ कॅमेका, स्पिकर आणि साऊंड रेकॉर्डिंगची सोय असून, रुग्ण व डॉक्टर यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्काविना दूरवरूनच संवाद शक्य होईल. त्याच प्रमाणे या यंत्राची २० किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता असून, रुग्णांपर्यंत औषधे, जेवण, पाणी किंवा अन्य साहित्य पोचवणे शक्य होईल. त्यामुळे कोविड १९ सारख्या संसर्गजन्य आजारामध्ये प्रत्यक्ष संपर्क टाळण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे संसर्गाच्या शक्यता व जोखीम कमी करणे शक्य होते. याला कोवी रोबो असे नाव दिले आहे. नुकताच टाटा टेक्नॉलॉजीतर्फे हा कोवी रोबो सातारा जिल्हा प्रशासनाला भेट देण्यात आला आहे.
संपर्क अनिल ढोले, ९१३०००९०७९
0 Comments